राज्यभर पाऊस पण हे ४ जिल्हे तापून निघणार, हवामान खात्याकडून कडक उष्णेतचा इशारा

अकोला/प्रतिनिधी राज्यात एकीकडे चक्रीवादळाचा फटका तर दुसरीकडे मान्सून वेशीवर आला आहे. असं असतानाही राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढतांना दिसत आहे. त्यात विदर्भात उन्हाच्या झळा तापदायक ठरताहेत. मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर असून येत्या काही तासांत पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असला तरी अकोला तापतच आहे. आज विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा आणि वाशिम भागात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, काल अकोला शहरात ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर सोमवारी ४२.८, रविवारी ४१.५, शनिवारी ४२.८, गुरुवारी ४२.३ असं मागील काही दिवसांतील अकोला शहरातील तापमान होतं. दरम्यान, १६ जूनपर्यंत विदर्भातील काही शहरात तसेच अकोल्यात ४१ अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचा अंदाज अकोल्याच्या हवामान विभागानं वर्तविला आहे. पुढे १६ जूननंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात कधी दाखल होणार मान्सून?

यंदा मान्सूनचे आगमन केरळातच उशिरा झाल्याने नियोजित वेळेपेक्षा विलंब झालाय. मात्र, आता लांबलेला मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर असला तरी अकोल्यात मात्र सूर्य आग ओकत असल्याचं चित्र आहे. विदर्भात मान्सूनचे आगमन साधारणपणे १६ जूनच्या आसपास होणार आहे. असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. मात्र, यंदा स्थिती वेगळी निर्माण झाली असल्यानं मान्सून पोहोचण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अकोला जिल्ह्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तापमान वाढले होते. नंतर काही दिवस उन्हाची तीव्रता किंचित कमी झाली. मात्र, शेवटच्या आठवड्यात पुन्हा तापमान वाढतच गेले. जून महिन्याचे १२ दिवस लोटल्यानंतरही सूर्य आग ओकत असल्याचे काल मंगळवारी जाणवले. कारण, हे तापमान ४३.५ अंश सेल्सिअस इतके होते. तर काल ब्रह्मपुरी, गडचिरोली, नागपूर आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव इथे कमाल तापमान ४२ अंशांच्या पुढे होतं आणि उर्वरित राज्यात तापमान ३६ ते ४२ अंशांच्या दरम्यान दिसून आलं.