कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी तालुकास्तरावर केंद्र स्थापन करणार- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

वर्धा/प्रतिनिधी जास्तीत जास्त कामगारांना कामगार विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी तालुका स्तरावर लवकरच कामगार नोंदणी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. यामुळे नोंदणी वाढून जास्तीत जास्त कामगारांना विविध योजनांचा लाभ घेता येईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. कामगार विभागाच्यावतीने शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत दि.२२ ते ३० जुलै या कालावधीत कामगारांना विविध येाजनेचा लाभ देण्यासाठी कामगार सेवा सप्ताहाचे आयेाजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या समारोय कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला खा. रामदास तडस, आ.डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, कामगार आयुक्त नितीन पाटणकर, जिल्हा कामगार अधिकारी कौस्तुभ भगत, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुनील गफाट, माजी खासदार सुरेश वाघमारे, कामगार नेते मिलींद देशपांडे, प्रशांत बुर्ले आदी उपस्थित होते.

उद्योग व्यवसाय, बांधकाम इतर कामांमध्ये कामगारांची भूमिका महत्वाची असते. परंतु या कामामध्ये कामगारांना सन्मान मिळत नाही. त्यांना सन्मान मिळावा व त्यांना लाभ मिळावा मासाठी शासनाच्यावतीने त्यांच्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ प्रत्येक कामगारांना मिळावा यासाठी जास्तीत जास्त कामगार नोंदणी व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आह. गेल्या वर्षात राज्यात १० लाख कामगारांची नोंदणी झाली असल्याचे श्री.खाडे यांनी सांगून या सर्व पात्र कामगारांना विविध योजनेचा लाभ देण्याचे काम राज्य शासन करीत आहे, ते म्हणाले. कामगारासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन स्थापन करण्यात येणार असून वर्धा जिल्ह्यात कामगार भवन निमार्ण करण्यासाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करुन दिल्यास बांधकामासाठी विभागाच्यावतीने निधी उपलब्ध करुन देऊ, असेही ते म्हणाले.

यासोबतच कामगारांच्या कुटूंबाच्या आरोग्यासाठी कामगार रुग्णालय सुरु करण्यात येणार असून यामुळे कामगारांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच कामगारांच्या कुटूंबासाठी विमा पॉलिसी सुरु करणार असल्याचे सुरेश खाडे म्हणाले. कामगारांच्या कुटूंबांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने कामगार रुग्णालय सुरु करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे खा. तडस म्हणाले. केंद्र व राज्य शासनामार्फत कामगारासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा कामगारांनी लाभ घ्यावा असे आवाहनही श्री.तडस यांनी यावेळी केले. तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी केलेल्या कामगारांना योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होत आहे.

या समस्या कामगार विभागाने दूर करुन विभागामध्ये असलेल्या रिक्त जागा भरण्याची सूचना यावेळी आ.डॉ.भोयर यांनी केल्या. या मेळाव्यातून ३ हजार ४३४ कामगारांना विविध योजनेचा लाभ देण्यात आला असल्याचेही डॉ. भोयर यांनी सांगितले. शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी सुध्दा बांधकाम क्षेत्रात कामगार म्हणून कार्यरत असून त्यांनी सुध्दा कामगार विभागाच्या योजनांसोबतच घरकुलसारख्या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच प्रधानमंत्री रोजगार व मुख्यमंत्री रोजगार योजनेतून कर्ज उपलब्ध करुन आपला व्यवसाय सुरु करावा, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कामगारांच्या कुटूंबियांना शिष्यवृत्तीचे अनुदान, कामगाराच्या मुलींच्या शिक्षणासाठी अनुदान व कामगारांना बांधकाम साहित्याच्या पेटीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येंने कामगार उपस्थित होते.