
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : आज सर्वत्र ‘जागतिक पर्यावरण दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. ‘आपली जमीन, आपले भविष्य’ या संकल्पनेवर आधारित यंदाचा पर्यावरण दिन पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राची ऊर्जावाहिनी असलेल्या महावितरणने पर्यावरणाच्या रक्षणासाठी अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतले असून, ‘हरित ऊर्जा, हरित महाराष्ट्र’ या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. जागतिक तापमानवाढ, प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास यांसारख्या गंभीर समस्यांनी आज जगाला विळखा घातला आहे. अशा स्थितीत, ऊर्जा क्षेत्राची पर्यावरणाप्रती असलेली जबाबदारी अधिक वाढते. महावितरणने ही जबाबदारी ओळखून, केवळ वीजपुरवठा करण्यापलीकडे जाऊन, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी सक्रिय भूमिका घेतली आहे.