मणिपूरमधून बाहेर पडण्यासाठी कोलकाताचे नागरिक मोजत आहेत तब्बल २५ हजार रुपये

इंफाळ/प्रतिनिधी गेले काही दिवस मणिपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचारामुळे अनेक लोक तिथे अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर तेथून घरी परतणाऱ्यांची संख्या अचानक अनेक पटींनी वाढली आहे. गेल्या आठवड्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून, राज्यात राहणारे कोलकाताचे लोक कोणत्याही मार्गाने आपल्या घरी परतण्याची घाई करत आहेत. यामुळे इंफाळ ते कोलकाता खाजगी विमानांचे भाडे २५,००० रुपयापर्यंत पोहोचले आहे, जे सामान्य किमतीपेक्षा ८ पट जास्त आहे. साधारणपणे, दोन शहरांमधील विमान प्रवासाचे भाडे जवळपास २५०० ते ३००० रुपये आहे.

इथून तात्काळ बाहेर पडण्यासाठी हजारो लोक आपल्या विमानाची वाट पाहत होते. बरेच लोक विमानाची वाट पाहत जमिनीवर बसलेले किंवा झोपलेले आहेत. शहरात ून बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या पाहता, विमानतळ सार्वजनिक बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनसारखे दिसते होते. इंफाळ – कोलकातादरम्यान उड्डाण करणार्या विमान कंपन्यांनी सांगितले की, कोलकाता येथे जाणारी सर्व उड्डाणे सुरू आहेत. तसेच वाढत्या मागणीमुळे अतिरिक्त उड्डाणे चालविण्यात येत आहे. मात्र ट्रॅव्हल एजंटच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या परिस्थितीमुळे पुढील काही दिवस विमान भाडे कमी होण्याची शक्यता नाही. कोलकाता विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंफाळहून सुटणारी सर्व उड्डाणे फूल आहेत आणि तिकिटाची मागणी लक्षणीय वाढली आहे.

दरम्यान, शहरातील परिस्थिती चिघळली आहे. अजूनही शहरात कुठेच इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. दुकानेही बंद असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रविवारी बाजारपेठा आणि दुकाने काही तास खुली होती, परंतु या काळात लोकांच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या होत्या आणि फक्त विमान तिकीट असलेले लोक घराबाहेर पडत होते.