हिंगणघाटात अखेर प्रशासन झुकले! नागरिकांच्या अन्नत्याग आंदोलनाला विजयाचा मुहूर्त!

 प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात रस्त्यावर उतरलेल्या संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांच्या अन्नत्याग आंदोलनाने अखेर प्रशासनाचे डोळे उघडले! आठवडाभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाने सुरुवातीला पूर्णपणे दुर्लक्ष केले होते, मात्र नागरिकांच्या जिद्दीसमोर अखेर अधिकाऱ्यांना झुकावे लागले.

कलोडे सभागृहासमोरील झोपडपट्टीचे दुसरीकडे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी दिलीप बालपांडे, राहुल झाडे, शितलताई राऊत व उमाताई भोयर हे अन्नत्याग आंदोलनावर बसले होते. वाढत्या उन्हात, प्रकती ढासळत असतानाही त्यानी हार मानली नाही.

शेवटी तहसीलदार शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उरकुडे व ठाणेदार राऊत घटनास्थळी दाखल झाले आणि सविस्तर चर्चेनंतर प्रशासनाने मागण्या मान्य केल्या. लिखित आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी नारळपाणी पिऊन अन्नत्याग संपवला.

या क्षणी उपस्थित नागरिकांच्या जयघोषात आंदोलनकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, काँग्रेस नेते प्रवीण उपासे, समाजसेवक मोहम्मद रफीक, सुनील डोंगरे, माजी नगरसेवक अशोक पराते, बालाजी गहलोत आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी झोपडपट्टी हटाव संघर्ष समितीच्या ठाम भूमिकेचे आणि शांततेच्या पण तीव्र आंदोलनाचे कौतुक केले. नागरिकांच्या संघटित लढ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले – एकजुटीसमोर प्रशासनही नतमस्तक होते! तुकडोजी वॉर्डातील नागरिक आणि झोपडपट्टी हटाव संघर्ष समितीने या आंदोलनाला साथ देणाऱ्या सर्व राजकीय, सामाजिक संघटनांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *