जिल्ह्यात १.१३ लाख हेक्टरवर झाली खरीप पिकांची लागवड
प्रतिनिधी / दै. जन-संग्रामवर्धा : जिल्ह्यात २१ जूनपासून विश्रांती घेत पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांनीही पेरणीच्या कामाला गती दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १.१३ लाख हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन व तूर पिकाची लागवड करतात. यावर्षी ४ लाख १८ हजार हेक्टरवर विविध खरीप पिकांची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. जून महिन्याचे तीन आठवडे कोरडे गेले. २१ जूनपासून पावसाला सुरुवात झाल्यावर जिल्ह्यातील शेतकरी पेरणीच्या कामाला लागले. ३० जूनपर्यंत जिल्ह्यात १ लाख १३ हजार २२७ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाली आहे.
१५२०६ हेक्टरवर झाला तुरीचा पेरा
मंगळवार, ३० जूनपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १५ हजार २०६.७ हेक्टर तुरीची लागवड केली आहे. आर्वी तालुक्यात ३ हजार १७ हेक्टर, आष्टी तालुक्यात २०८५.९ हेक्टर, देवळी तालुक्यात २२९८.४ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १५०८.४ हेक्टर, कारंजा तालुक्यात ८०० हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात ७८१ हेक्टर, सेलू तालुक्यात २४९१ हेक्टर, तर वर्धा तालुक्यात २२२५ हेक्टर तुरीचा पेरा झाल्याचे सांगण्यात आले.
७१ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड
जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजार ९६.४६ हेक्टर कपाशीची लागवड झाली आहे. आर्वी तालुक्यात ५ हजार ९४६ हेक्टर, आष्टी तालुक्यात १० हजार ८९९ हेक्टर, देवळी तालुक्यात ११ हजार ४१५ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात ९ हजार १०४.८ हेक्टर, कारंजा तालुक्यात ४ हजार ३३६ हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात ७ हजार २४ हेक्टर, सेलू तालुक्यात १२ हजार ५८० हेक्टर, तर वर्धा तालुक्यात ९ हजार ७१४ हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
२६,६८८ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा
जिल्ह्यात ३० जूनपर्यंत २६ हजार ६८८ हेक्टर सोयाबीन पिकाची लागवड झाली. आर्वी तालुक्यात ३२९८ हेक्टर, आष्टी तालुक्यात ४४१०.७७ हेक्टर, देवळी तालुक्यात ५६५०.१ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात २०५५ हेक्टर, कारंजा तालुक्यात ११११ हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात १३५० हेक्टर, सेलू तालुक्यात ४५५७ हेक्टर, तर वर्धा तालुक्यात ४१७७ हेक्टर सोयाबीनचा पेरा झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.








