ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पुराव्यासह पाकिस्तानचा बुरखा फाडला!
यावेळी माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितलं की, जम्मू काश्मीरमधील वाढतं पर्यटन आणि चांगली होत असलेली अर्थव्यवस्था यांच्यावरती परिणाम करण्यासाठीचा पहलगाममध्ये हा प्रयत्न केला होता. या हल्ल्याचा उद्देश विकास आणि प्रगती थांबवून राज्याला मागास करणे हा त्यांचा हेतू होता. पाकिस्तानचा हल्ल्यातील सहभाग उघड आहे, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना शासन होणं गरजेचं होतं. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली आहे. हल्लेखोरांचीही ओळख पटली आहे. आमच्या गुप्तचर यंत्रणेने हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांबद्दल माहिती गोळा केली आहे.
या हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध आहे. पाकिस्तानला दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून जगभरात मान्यता मिळाली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. हल्ल्याच्या पंधरा दिवसांनंतरही पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांनी उलट आरोप केले. भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात. म्हणून त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. भारताने दहशतवाद संपवण्यासाठी प्रतिसाद दिला आहे. दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमधील विकास थांबवू इच्छितात. टीआरएफ ही लष्करशी जोडलेली संघटना आहे. पहलगाम हल्ल्यात टीआरएफचा सहभाग आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे.