वर्धा साहित्य संमेलन : मंडप व दालने उभारणीने घेतला वेग

वर्धा/प्रतिनिधी वर्धा येथे दिनांक ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीने वेग घेतला आहे. स्वावलंबी विद्यालयाच्या २३ एकरातील मोकळ्या मैदानात मंडप व विविध दालनांच्या उभारणीचे काम जोरात सुरु आहे. विविध ४२ समित्यांच्या माध्यमातून हजारो स्वयंसेवक संमेलनाच्या यशस्वीतेसाठी दिवस रात्र झटत आहे. यापुर्वी वर्धा शहरातील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावरच साहित्य संमेलन पार पडले होते. त्याच मैदानात अनेक वर्षानंतर संमेलन होत आहे. त्यामुळे वर्धा शहरातील साहित्य, सांस्कृतिक, कला, सामाजिक, शिक्षण, आरोग्य तसेच शासकीय यंत्रणेसह विविध क्षेत्रातील हजारो स्वयंसेवक संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पुढे सरसावले आहे. निवास, भोजन, मंडप, वाहतूक, रंगमंच अशा विविध समित्यांच्या बैठक सद्या संमेलन आयोजन समितीच्या हंगामी कार्यालयात नियमितपणे पार पडत आहे.