मोदी सरकारने घातली पीएफआय संघटनेवर बंदी

नवी दिल्ली/प्रतिनिधी पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात पीएफआय आणि त्याच्याशी संलग्नित असलेल्या ८ संघटनांवर केंद्र सरकारने ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. गृह मंत्रालयाने अनलॉफुल ॲक्टिविटीज प्रिवेन्शन एक्ट अंतर्गत ही कारवाई केली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातला अध्यादेशही जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध तपास यंत्रणांनी देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापे मारले होते. २२ सप्टेंबर रोजी एनआयए तसेच ईडी अशा काही तपास यंत्रणांनी संयुक्तपणे पीएफआयवर कारवाई केली होती. या संघटनेशी संबंधित १०६ लोकांना या पहिल्या फेरीमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या गोष्टींच्या आधारे दुसऱ्या फेरीत जवळपास २४७ लोकांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर या तपास यंत्रणांनी गृह मंत्रालयाकडे केलेल्या शिफारसीनुसार गृहमंत्रालयाने पाच वर्षांसाठी पीएफआय आणि त्याच्याशी संलग्नित असलेल्या ८ संघटनांवर बंदी घातली आहे.