सीईटी सेल द्वारे अ. भा. विद्यार्थी परिषदेची मागणी मान्य

वर्धा/प्रतिनिधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या निवेदनावर विचार करून सीईटी सेल द्वारे एम.बी. ए प्रवेशाची फेर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक २५ मार्च २०२३ रोजी एमबीए सीईटी च्या परीक्षेत तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे फार नुकसान झाले होते यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वर्धा येथील अग्निहोत्री महाविद्यालय केंद्रावर घटनेचा निषेध करित सीईटी सेल ला फेर परीक्षेबाबत मागणी केली होती. येत्या २७ एप्रिल ला पुन्हा ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून ११ एप्रिल पर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात.
दिनांक २५ मार्च २०२३ ला सकाळी ९ :३० ते ११:३० या मूळ कालावधी दरम्यान परीक्षा सुरु असताना तांत्रिक अडचणीमुळे अर्धा तास अगोदरच परीक्षा समाप्त झाली होती ,यावर अभाविप वर्धा जिल्हा संयोजक वैभव राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सीईटी सेल ला निवेदन देऊन फेर परीक्षेची मागणी केली होती या मागणी वर आता सकारात्मक निर्णय आला आहे.