इंदूरमधील मंदिर दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू, राज्य सरकारचे चौकशीचे आदेश

भोपाळ/प्रतिनिधी मध्य प्रदेशातील इंदूरमधील पटेल नगर भागात गुरुवारी रामनवमीच्या उत्सवादरम्यान मंदिराचा काही भाग कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधल्या पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील छत कोसळूल्याने २५ हून अधिक जण विहिरीत पडल्याची घटना घडली. त्यापैकी आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामध्ये १० महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. इंदूरमधील दुर्घटनेने अत्यंत दु:ख झाले आहे. मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली. राज्य सरकार जलद गतीने बचाव आणि मदत कार्य करत आहे. सर्व बाधित आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत माझी प्रार्थना, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील प्राचीन बावडीच्या (मोठी विहीर) छतावर मोठ्या संख्येने लोक जमले होते आणि त्याचा भार सहन न झाल्याने ते छत कोसळलं. रामनवमीचा उत्सव सुरू असताना ही घटना घडली.
विहीर सुमारे ५० फूट खोल असल्याची माहिती
रामनवमीच्या निमित्ताने मंदिरात यज्ञाचं आयोजन करण्यात आलं ोतं. यात सहभागी होण्यासाठी लोक मोठ्या संख्येने मंदिरात हजर होते. लोक पूजा अर्चा करत होते. तर त्यात मंदिरात एक पायऱ्यांची विहिर होती, ज्यावर दहा वर्षांपूर्वी छत टाकण्यात आलं होतं. पूजेच्या वेळी २० ते २५ लोक विहिरीच्या छतावर उभे होते, त्याच वेळी छत खचलं. छत कोसळल्याने सर्वजण विहिरीत पडले. दरम्यान ही विहीर सुमारे ५० फूट खोल असल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातानंतरही बराच वेळ अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि ॲम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचलेल्या नव्हत्या. तर या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरसेवक यांच्यासह प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांच्यासह सर्व एमआयसी सदस्य बैठक सोडून अपघातस्थळी निघाले. दरम्यान बेलेश्वर महादेव मंदिरातील या दुर्घटनेची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दखल घेतली आहे. शिवराज सिंह यांनी इंदूरचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना फोन करुन बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत्याने संपर्कात आहे.