कार चढली दुभाजकावर, एक ठार तर चौघे गंभीर

वर्धा/(भुषण वानखेडे) वर्धेकडून नागपूरकडे भरधाव जाणारी एमएच २७ बीझेड ८९०६ क्रमांकाची कार अनियंत्रित होत रस्ता दुभाजकावर चढली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झालेत. ही घटना शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास वर्धा- नागपूर महामार्गावरील धानोली फाट्याजवळ घडली. यवतमाळ येथील एका कुटुंबाचा नागपूरच्या तुली हॉटेल येथे शनिवार, दि. ५ रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम असल्याने याच कुटुंबातील पाच व्यक्ती यवतमाळ येथून कारने नागपूरच्या दिशेने जात होते. भरधाव कार सेलूनजीकच्या धानोली फाट्याजवळ आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहन थेट रस्ता दुभाजकावर चढले. अपघात इतका भीषण होता की कार दुभाजक ओलांडून वर्धेच्या दिशेने वळली. या अपघातात कारमधील भावेश भरुड (२५, रा. गणेशनगर, यवतमाळ) याचा जागीच मृत्यू झाला. तर यश गणेश इंगोले (२२), शंतनू रामभाऊ पराते (२३), ऋतिक गजानन गायकवाड (२२) व अथर्व चालमवार (२३, सर्व रा. यवतमाळ) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद सेलू पोलिसांनी घेतली आहे.