कला दिग्दर्शनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले नितीन देसाई यांची आत्महत्या

कर्जत/प्रतिनिधी मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कला दिग्दर्शक म्हणून सुप्रसिद्ध असलेले आणि कला दिग्दर्शनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जत येथील त्यांच्या एन. डी स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. या वृत्ताने सबंध मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. स्टुडीओतील कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर त्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. आता त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करत आहेत. नितिन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ते लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. त्यांची अशा प्रकारे आत्महत्या हा एक मोठा धक्का आहे.

नितिन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते. “१९४२ अ लव्ह स्टोरी’, “हम दिल दे चुके सनम’, “माचिस’, “देवदास’, “लगान’, “जोधा अकबर’ या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. त्याचबरोबर बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी, यासारख्या अनेक चित्रपटासाठी त्यांनी सेट तयार केले होते. “राजा शिवछत्रपती’ या अत्यंत लोकप्रिय आणि गाजलेल्या मराठी मालिकेची त्यांनी निर्मिती केली होती. २०११ मध्ये, त्यांनी गजेंद्र अहिरे दिग्दर्शित “हॅलो जय हिंद’ या मराठी चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.