काँग्रेसचा अमरावती लोकसभा लढण्याचा उद्धव ठाकरेंकडे आग्रह; आमदार यशोमती ठाकूर यांनी घेतली भेट

अमरावती/प्रतिनिधी अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व असल्याने या मतदारसंघातून काँग्रेसला निवडणूक लढवू द्यावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांची विश्रामगृहावर भेट घेतली. अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रभुत्व अधिक असल्याने आमचा अमरावती लोकसभा लढविण्याचा आग्रह असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत करण्याची अमरावतीची परंपरा आहे. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी आलो आहोत, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्ताधाऱ्यांनी तात्काळ घ्याव्यात, कोणाची किती ताकद आहे, हे दाखवून देऊ, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.