विदर्भ ट्रॅव्हल्सच्या मालकावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

वर्धा/प्रतिनिधी समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सला भीषण अपघात होऊन २५ जणांचा नाहक बळी गेला. यात वर्धा जिल्ह्यातील १४ जणांचा समावेश आहे. दरम्यान, रविवार ९ रोजी दुपारी स्थानिक शांती भवनात मृतकांच्या कुटुंबीयांनी बैठक घेत ट्रॅव्हल्स चालकाप्रमाणे मालकावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असा एकसूर आवळला. १ जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सचा बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या ट्रॅव्हल्समध्ये सावंगी मेघे चौपाटीवरून पुणे येथे जाण्यासाठी जिल्ह्यातील १४ प्रवाशी बसले होते. या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला. चालक हा मद्यधूंद अवस्थेत असल्याने हा अपघात घडल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या घटनेला मालकही तेवढेच जबाबदार असल्याचा सूर रविवारी मृतात्म्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या बैठकीत उगारला.

विदर्भ ट्रॅव्हल्सची तळवरीलहर ढीर्रींशश्री मान्यता रद्द करावी, खाजगी वाहन चालकाची एक फेरी झाल्यानंतर त्याला दुसर्या फेरीसाठी परवानगी देऊ नये, वाहनाची गती बांधलेली असावी, खाजगी वाहनाचे नियम अधिक कडक करावे, समृद्घी महामार्गावर १०० ते १५० किमीचा प्रवास झाल्यानंतर एक थांबा अनिवार्य करावा, ट्रॅव्हल्सची तिकीट कॅन्सल पॉलिसी देण्यात यावी, ट्रॅव्हल्स मालकावर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी, नागपूर ते पुणे रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी, अपघाताच्या संपूर्ण प्रकरणाची एक चौकशी समिती नेमून पीडितांना न्याय द्यावा, प्रत्येक कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे आदी मागण्यावजा चर्चा या बैठकीत करण्यात आली. यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही बैठकीत एकमत झाले आहे.