खूशखबर! २३ जूनपासून संपूर्ण भारतात पावसाची हजेरी; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. पंरतु अद्याप म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. आता हवामान विभागाने २३ जूनपासून संपूर्ण भारतामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकला होता. केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती. मात्र ११ जून रोजी राज्यात मान्सूनने हजेरी लावली. राज्यात पुढच्या ४, ५ दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. त्यानुसार आज हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजामध्ये भारतात येत्या ४ आठवड्यांसाठी पावसाचा विस्तारित श्रेणीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

येत्या २३ जूनपासून मध्य भारत व महाराष्ट्रात मान्सून बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. दरम्यान, मान्सून यंदा उशिराने येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. ११ जून रोजी मान्सूनने हजेरी लावली असली तरी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही.