कोरोमंडल १२८ च्या वेगाने धडकली अन् डबे पत्त्यासारखे विखुरले; रेल्वेने सांगितलं अपघाताचं कारण

नवी दिल्ली/प्रतिनिधी ओडिशातील बालासोर रेल्वे दुर्घटनेबाबत रेल्वे बोर्डाने पत्रकार परिषद घेत सारी माहिती दिली. रेल्वे बोर्डाच्या सदस्या जया वर्मा यांनी या अपघाताबाबत सांगितले की हा अपघात अतिवेगाने झालेला नाही. तसेच, फक्त कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातात बळी ठरली आहे. तसेच त्यांनी सांगितलं की या अपघाताविषयी काही गैरसमज झाले आहेत त्याची माहिती द्यायची आहे, जेणेकरून परिस्थिती स्पष्ट होईल. सर्वप्रथम रिलीज फॉर रेस्क्यू करण्यात आलं त्यानंतर आम्ही रिस्टोरेशनची प्रक्रिया सुरु केली. बालासोर जिल्ह्यात बहनगा बाजार रेल्वे स्टेशन आहे. ही घटना २ जून रोजी सायंकाळी ६.५५ वाजता घडली. कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात झाला. या स्थानकात उभी असलेली इतर गाड्याही त्याच्या कचाट्यात आली. त्या वेळी दोन मेल एक्स्प्रेस गाड्या स्टेशनवरून वेगवेगळ्या दिशेने जाणार होत्या.

स्थानकावर दोन मेन लाइन आहेत, जिथे ट्रेन न थांबता जाते, तर त्याच्या बाजूला दोन लाइन असतात, ज्याला लूप लाइन म्हणतात. जिथे ट्रेन थांबते. रेल्वे बोर्डाच्या म्हणण्यानुसार, लूप लाईनवर २ गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. तर इतर दोन मार्गांवरुन न थांबणाऱ्या गाड्या सोडण्यात येत होत्या. बंगळुरूहून चेन्नईच्या बाजूने यशवंतपूर एक्सप्रेस येत होती ही ट्रेन कोरोमंडलच्या काही सेकंद आधी येत होती. कोरोमंडल एक्सप्रेस शालिमार रेल्वे स्थानकावरून हावडा दिशेहून चेन्नईला जाण्यासाठी येत होती. त्यासाठी सिग्नल हिरवे होते आणि सर्व काही सेट होतं.

ओव्हरस्पीडिंगचा प्रश्नच नव्हता आणि पायलटला सिग्नल हिरवा दिसत होता त्यामुळे तो सरळ जाणार होता. ग्रीन सिग्नलनुसार चालकाने त्याच्या ठरलेल्या वेगात गाडी पुढे नेली. तेव्हा ही गाडी ताशी १२८ किलोमीटर वेगाने जात होता. यशवंत एक्स्प्रेसही ताशी १२६ किमी वेगाने येत होती. ओव्हरस्पीडिंगचा काही प्रश्नच नव्हता, असं बोर्डाने सांगितलं.

रेल्वेमंत्री ३६ तासांपासून घटनास्थळी, बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत

रेल्वे मंत्री गेल्या ३६ तासांपासून घटनास्थळी आहेत. ते सर्व ऑपरेशन्सवर लक्ष ठेवून आहेत आणि बचाव कार्यात मदत करत आहेत. प्राथमिक तपासानुसार आतापर्यंत जी कारणे समोर आली आहेत, त्यामध्ये सिग्नलिंगमध्ये समस्या आढळून आली असून, रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. त्यांचा तपास पूर्ण होईपर्यंत अधिक काही सांगता येणार नाही, असं बोर्डाने स्पष्ट केलं. आम्ही रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा सविस्तर अहवाल येण्याची वाट पाहत आहोत. कोरोमंडल एक्स्प्रेसचाच अपघात झाला. जास्त गाड्यांची टक्कर झाली असे म्हणणे चुकीचे ठरेल. फक्त कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात झाला आहे. हे कोणत्या कारणास्तव घडले आहे, याचा शोध घेत आहोत.

वेगात झालेल्या धडकेचा फटका ट्रेनला बसला

जया वर्मा म्हणाल्या की कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन अतिशय सुरक्षित आहे आणि सहसा ती उलटत नाही. या प्रकरणात, वेगात ट्रेन धडकल्याने त्याचा संपूर्ण इम्पॅक्ट हा ट्रेनवर आला. जगातील कुठलंही तंत्रज्ञान याच्या प्रभावाला थांबवू शकलं नसतं. ज्या मालगाडीला कोरोमंडल जाऊन धडकली त्यामध्ये लोखंड भरलेलं होतं. लोखंडाने भरलेल्या मालगाडीच्या गुरुत्वाकर्षणाच्या केंद्रामुळे आणि त्याच्या वजनामुळे या अपघाताचा पूर्ण भार हा कोरोमंडल एक्स्प्रेसवर आला आणि इतकी मोठी दुर्घटना घडली. लोखंड भरलेलं असल्याने ही मालगाडी इतकी वजनी होती की धडकेनंतर ती आपल्या जागेवरून अजिबात हलली नाही, असं रेल्वे बोर्डाने सांगितलं.