घराला आग, ४ लाखांचे नुकसान

पुलगाव/प्रतिनिधी येथील हरिरामनगर रहिवासी संदीप विरूळकर व राजू विरूळकर यांच्या घराला आग लागून जवळपास ४ लाखांचे नुकसान झाले. ही घटना १८ रोजी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. संदीप विरूळकर आणि राजू विरूळकर यांच्या घराला आज पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. खोलीमध्ये कापूस साठवून ठेवला होता. त्यामुळे आगीने चांगलाच भडका घेतला. खोलीमधून धूर निघत असल्याने ही बाब शेजार्यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ विरूळकर यांना झोपेतून जागे केले. आग लागल्याची माहिती गावात पसरताच नागरिकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवले. या खोलीमध्ये २५ क्विंटल कापूस, सिलेंडर, लाकडी फाटे, कुलर, पंखे, सायकल, कपडे, गहू, दाळ, धान्य सर्व आगीमुळे नष्ट झाले. त्यामुळे इंदिरा विरूळकर यांचे ३ लाखांचे व राजू विरूळकर यांचे १ लाखाचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पटवारी भरत डेहनकर यांनी नुकसानीचा पंचनामा केला.