समृद्धी महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक, तीन जण जागीच ठार

वर्धा/प्रतिनिधी यवतमाळकडून नागपूरकडे जात असलेल्या ट्रकवर कारने जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोन महिला डॉक्टरांसह एक जण जागीच ठार झाले. हा अपघात मध्यरात्री साडे बारा वाजताच्या सुमारास सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गावर झाला. जाम पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे आपल्या कर्मचाऱ्यांसह अपघात स्थळीपोहोचून पंचनामा करीत वाहतूक सुरळीत केली. डॉक्टर ज्योती क्षीरसागर,डॉक्टर फाल्गुनी, भरत क्षीरसागर अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, एम एच०४, डी एल. ८२३५ क्रमांकाचा ट्रक यवतमाळ कडून नागपूरकडे जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या एम एच ३७जी.३५५८ क्रमांकाच्या व्हॅगनार कारने या धावत्या ट्रकला जबर धडक दिली.
या भीषण अपघातात कार मधील तिघेही जागीच ठार झाले. जाम पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कार ही महिला चालवत होती अशी माहिती आहे. अंधारात समोरील ट्रक दिसला नसल्याने अति वेगात असलेल्या कारच्या स्टेरिंर्ग वरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती आहे. सेलू पोलीस स्टेशन यांना देण्यात आलेली आहे.