राष्ट्रवादीत भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री पद्धत, त्यांना शुभेच्छा; फडणवीस यांचा टोला

अहमदनगर/प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेल्या फलकावर उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी पंतप्रधान, भावी पंतप्रधान असे म्हणायची पद्धत आहे. त्यामुळे जे जे भावी आहेत, त्यांना शुभेच्छा. राजकारणात काहीही होत असते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असे कोणालाही वाटले नव्हते, असेही फडणवीस म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यात लोणी येथे आयोजित राज्यस्तरीय महसूल परिषदेसाठी फडणवीस आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. सध्या गाजत असलेल्या पहाटेचा शपथविधी आणि त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानावर फडणवीस म्हणाले, या प्रकरणात सध्या जे गौप्यस्फोट होत आहेत, त्यातून मी जे बोललो ते खरे असल्याचे स्पष्ट होत आहे. तरीही आतापर्यंत अर्धेच सत्य बाहेर आले आहे.
आणखी अर्धी गोष्ट बाहेर यायची आहे. ती संपूर्ण गोष्ट सुद्धा लवकरच बाहेर येईल. पुण्यातील पोट निवडणुकीच्या प्रचारात वरिष्ठ नेते सहभागी होत असल्यासंबंधीच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, कोणतीही निवडणूक गांभीर्याने घ्यायची असते. शिवाय लोकांकडे मते मागायला जाण्यात काही लाज कशाला बाळगायची? याप ूर्वीही अनेक पोट निवडणुकांमध्ये प्रचारासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गेले आहेत. पुण्यातील पोटनिवडणुकीत स्वत: शरद पवार गेले आहेत. यापूर्वीच्या कोणत्याही पोटनिवडणुकीत ते गेले नव्हते. त्यांनाही काही ना काही वाटत असेल म्हणून तर ते प्रचाराला गेले असतील. राजकारणात आमचे वैचारिक विरोधक आहोत, शत्रू अजीबात नाहीत महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय संस्कृती आहे. मात्र, अलिकडच्या काळात यात शत्रूत्त्वाची भावना पहायला मिळते. ती आपल्याला संपवावी लागेल. ठाकरे पिता-पुत्रांनी वेगळा राजकीय मार्ग पत्करला.
आमचा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे आम्ही शत्रू होत नाही, तर वैचारिक विरोधक आहोत, असेही फडणवीस म्हणाले. खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर शिवसेनेत फूट पाडल्याचा आरोप केला होता. त्यासंबंधी फडणवीस म्हणाले, राऊत यांना माझी क्षमता अधिक वाटत असेल. त्याबद्दल त्यांचे आभार. मात्र, अलिकडे राऊत जे बोलतात ते अजिबात गांभीर्याने घेण्यासारखे नाही. त्यांनी लक्षात घ्यावे की, ते एका राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी वस्तुस्थिती पाहून आणि लोकांना खरे वाटेल, असे बोलले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.