जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाची नियोजन बैठक

वर्धा/प्रतिनिधी वर्धा येथे दि.३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाची बैठक आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. अनेक वर्षानंतर आयोजनाचा मान वर्धेला मिळाला असल्याने हे संमेलन उत्साहात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा.प्रदिप दाते, सरचिटनिस विलास मानेकर, महेश मोकलकर, अनिल गडेकर आदी उपस्थित होते. वर्धा येथे होणारे हे साहित्य संमेलन साहित्याचा मोठा उत्सव आहे. या उत्सवात वर्धा येथील साहित्य रसिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. साहित्य संम्मेलनस्थळी आवश्यक सुविधा, पुस्तकाचे स्टॉल, ग्रंथ दिंडी मार्ग, बाहेरुन येणारे साहित्यिक, पाहुणे, मान्यवर व साहित्य रसिकांची निवास व्यवस्था, भोजन, वाहतुक व्यवस्था आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींकडून सर्वांगाने सहकार्य मिळावे, यासाठी देखील यावेळी चर्चा झाली. साहित्य संमेलनात विविध प्रकाशनांचे ३५० पेक्षा अधिक ग्रंथदालने राहणार आहे. या दालनांचा वाचकांचा पुर्ण लाभ घेता यावा यासाठी या दालनांचे आदल्या दिवशी म्हणजे २ फेब्रुवारी रोजीच उद्घाटन करुन वाचकांसाठी खुले करण्यात येणार आहे. राज्य व राज्याबाहेरुन जवळपास १५ हजार रसिक उपस्थित राहणार असून एकून उपस्थित राहणाऱ्या रसिकांची संख्या एक लाखावर राहण्याचा अंदाज यावेळी आयोजकांनी व्यक्त केला. ईतक्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या रसिकांची व्यवस्था याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.